मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २४ जानेवारी दरम्यान ‘चार दिवस मौजेचे’ या आगळ्यावेगळ्या गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोरेगाव(पूर्व) मधील पांडुरंगवाडी मैदानात दररोज सायंकाळी ७ वाजता गप्पांचा हा कार्यक्रम रंगणार असून पहिल्या दिवशी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मभूषण विजया मेहता आपल्या आजवरच्या वाटचालीतील आठवणींना उजाळा देणार आहेत.
शुक्रवारी ग्लोबल वॉर्मिगवरील परिसंवादात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शाम असोलेकर व अतुल देऊळगावकर आणि ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक विनायक परब सहभागी होणार आहेत. शनिवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक पद्मविभूषण जयंत नारळीकर याची प्रकट मुलाखत जयंत एरंडे आणि मेघश्री दळवी घेणार आहेत.
या मालिकेचा समारोप रविवारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ताल-वाद्य-वादक त्रिलोक गुर्टू यांच्या प्रकट मुलाखतीने होणार असून शशी व्यास त्यांची मुलाखत घेणार आहेत.
रविवारीच सकाळी ९ वाजता सुलेखनकार अच्युत पालव यांची सुलेखनाच्या प्रत्यक्षिकासह मुलाखत होणार असून डॉ. शाम नाबर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
चार दिवस मौजेचे निमित्ताने कार्यक्रमस्थळी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले असून कार्यक्रम व प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.