१९७२ सालची गोष्ट. त्यावेळी नुकतीच गोरेगावात माणसांची वस्ती वाढत होती. गावासारख असलेल गोरेगाव नगरासारख सजू लागल होतं. नव्याने आकार घेणार्‍या या उपनगराला स्वत:चा असा वेगळा चेहरा असावा अशा इच्छेने काही तरुण धडपडत होते. एखादी संस्था स्थापन करुन कामाला सुरुवात करण्यास ते तरुण सज्ज झाले. नेमक्या कोणत्या दिशेने काम करावे याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून गोरेगावकर तरुण शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरेंना भेटले. बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं ’संस्था स्थापन करुन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू नका तर समाजात अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्याकडे लक्ष द्या. असं काम करा की जे दुसर्‍या कुणी केलं नसेल, ज्या कामाकडे कुणी पाहिलंही नसेल. आजच्या तरुणांमध्ये कोणतंही काम करण्याची क्षमता आहे. मात्र त्यांना विधायक कार्याकडे वळवायला पाहिजे. तसं झालं तर ही तरुण पिढी वेगळा इतिहास घडवेल.’
बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे तरुण कामाला लागले आणि १९७२ च्या १६ मार्चला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी संस्थेची स्थापना केली. समाज घडविण्याचं व्रत घेतलेल्या तरुणांनी आपल्या संस्थेला नाव दिलं ’प्रबोधन गोरेगाव’ आणि आपल्या कार्याचे क्षेत्र ठरविले - ज्ञान, कला आणि सेवा!
प्रबोधनने पहिला कार्यक्रम आखला तो नाट्‍यमहोत्सवाचा. पहिल्या नाट्‍यमहोत्सवानं ’प्रबोधन’ च्या कार्यकर्त्यांचा विश्वास बळावला. कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्याइतकं बळ त्यांच्या अंगी आलं आणि पहिल्याच वर्षापासून ’प्रबोधन’ ने वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली.
कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांच्या कलाप्रतिभेचा आविष्कार कलाप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचा प्रबोधनचा हा ’कलाप्रवास’ गत अनेक वर्षे अखंडीतपणे आणि विविध अंगांनी सुरु आहे. रांगोळीची प्रदर्शनं भरवून दुर्लक्षित रांगोळीकरांना प्रकाशात आणलं. संथावलेल्या एकांकिका सादरीकरणाला वेग आणण्यासाठी प्रबोधनने एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या. २००१ साली सुरु झालेल्या मुंबई महोत्सवांमुळे गोरेगावकरांना संगीतक्षेत्रातील विश्वविख्यात कलाकारांच्या कलांचा आस्वाद घेण्याची संधी प्रबोधनमुळे मिळते आहे. ’मुंबई महोत्सव’ मुळं पश्चिम उपनगरातील रसिकांच्या मनात ’प्रबोधन’ ची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. कलाप्रांतातील दिग्गजही प्रबोधनच्या मंचावर आपली कला सादर करताना सुखावतात, तृप्त होतात तर ’प्रबोधन’ मुळे मिळालेल्या कलानंदामुळे उपस्थित रसिकवृंद कृतार्थ होतात, भरुन पावतात.
माणसांच्या विचारांना - बुद्धिला चालना देणारे, कलागुणांना वाव देणारे, प्रकृति स्वास्थ्याचे रक्षण करणारे कार्यक्रम - उपक्रम प्रबोधन अगदी पहिल्यापासून राबवित आहे. थोरामोठ्यांचे विचार ऎकण्याची संधी मिळावी या आग्रहातून प्रबोधनने ’प्रबोधन व्याख्यानमाला’ सुरु केली. गोरेगावकरांची ज्ञानार्जनाची भूक भागविण्यासाठी २००० साली प्रबोधनने व्यासपीठाची सुरुवात केली. समाज जीवनात वेगवेगळ्या प्रांतात काम करणार्‍या कितीतरी लोकांनी गत वर्षांत प्रबोधन व्यासपीठावर हजेरी लावली आहे.
उमलत्या वयात मुलांवर चांगले संस्कार होणं जितकं गरजेचं असतं तितकीच योग्य वेळी त्यांना आत्मविकासाची संधी देणंही आवश्यक असते. यांच उद्दिष्टाने सुरु करण्यात आलेल्या दैनिक सामना वर्क्‍तृत्व स्पर्धेने हजारो विद्यार्थ्यांना सभाधारिष्ठ्य देण्यात महत्वाचे योगदान उचलले आहे.
शिक्षण क्षेत्रात, ज्ञानदानाच्या प्रांतातही प्रबोधन गोरेगाव महत्वाची भूमिका बजावित आहे.
करियरचा पाया घडविणार्‍या एस. एस. सी. परिक्षेसाठी नेमकं मार्गदर्शन देण्यासाठी प्रबोधनने पहिल्या वर्षापासूनच एस. एस. सी. व्याख्यानमाला सुरु केली.
झोपडपट्टीत राहणार्‍या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी संस्थेने जवाहरनगर, कोयना वसाहत येथील परिसरात ३२ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या बालवाड्या आजही सुरु आहेत.
प्रबोधनच्या कार्यसीमा, शिक्षण-कलेपुरत्याच मर्यादित नव्हत्या. क्रीडा हाही संस्थेच्या उद्दिष्टांचा एक भाग होता. कला-सेवेइतकंच क्रीडा विकासाकडे देखील प्रबोधनने स्थापनेपासून लक्ष द्यायला सुरुवात केली. २१ नोव्हेंबर १९९१ रोजी शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी क्रीडाभवनाचे उद्‍घाटन केले आणि ’स्व’च्या जाणीवेनं सुखावलेल्या प्रबोधनच्या कार्यकर्त्यांची क्रीडा क्षेत्रातील घोडदौड सुरु झाली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खो-खो, कबड्डी, क्रिकेट याबरोबर ऍथलेटीक, जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योग नृत्य याकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी व्यायामशाळा, हेल्थ क्लब, टेबल टेनिस, अन्य इनडोअर गेम्सच्या सोयींनी हळू हळू क्रिडाभवन सुसज्ज होत गेले. ’प्रोजेक्ट २०००’ सारख्या उपक्रमांद्वारे जागतिक दर्जाचे क्रिडापटू तयार करण्यासाठी प्रबोधनने महत्वाची पाऊले उचलली.
जनसामान्यांसाठी नियमित व्यायामाची निकड ओळखून गोरेगावकरांना सकाळ - संध्याकाळच्या चालण्यासाठी हक्काची जागा असावी म्हणून प्रबोधनने जॉगर्स पार्क विकसित केले. २१ मे १९९९ रोजी शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे यांनी त्याचे उद्‍घाटन केले.
२००४ साली ’ओझोन स्वीमिंग पूल आणि क्लब’ सुरु करुन प्रबोधनने गोरेगावकरांना पोहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.
उपनगरातील जनतेसाठी त्वरीत रक्‍तपुरवठा व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने प्रबोधनने रक्‍तपेढीची मुहूर्तमेढ शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर २००४ रोजी रोवली. अहोरात्र सेवा बजावणारी ही मुंबईतील एक ’हायटेक ब्लडबँक’ म्हणून ओळखली जाते. सदर रक्‍तपेढीचा उल्लेखनीय आगळा-वेगळा उपक्रम म्हणजेच मुंबईतील सर्वप्रथम संपूर्ण वातानुकूलित, सर्व साधनसामग्रीने सुसज्ज व प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व तंत्रज्ञांसह फिरते रक्‍त संकलन वाहन ’प्रबोधन रक्‍तवाहिनी’
’ग्रंथ हेच गुरु’! तांत्रिक मोहजालात अडकलेल्या युवा पिढीस तसेच बालकांस व वाचनाची आवड असुनही जोपासता न येणारे प्रौढ व ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रबोधनकार ठाकरे वाचनालय हे १६००० पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय सुरु करण्यात आले. २२ फेब्रुवारी २००९ रोजी ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री. मधु मंगेश कर्णीक यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. उच्च शिक्षणार्थींसाठी सुसज्ज अभ्यासिकेची सोय वाचनालयाच्या वास्तूत करण्यात आली.
वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मदतीचा हात देण्याचे प्रबोधन गोरेगावने ठरविले आहे. त्यादृष्टीनेच संस्थेने आता जनसेवेचे व्रत म्हणून मुंबईत प्रथमच धर्मादाय औषधपेढी सुरू केली आहे. या नवीन उपक्रमाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर शुक्रवार, २७ मार्च,२००९ रोजी करण्यात आला. प्रसिध्द विकसक व तारा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त शेखर दादरकर यांच्या ह्स्ते औषधपेढीचे उद्‍घाटन पार पडले. सदर औषधपेढी गोरेगाव आणि उपनगरातील सर्वसामान्य गरीब रुग्णांकरीता नक्कीच उपयुक्त ठरेल. सदर औषधपेढीत औषधांसोबतच वॉटरबेड, वॉकर, व्हील चेअर ई. उपकरणे देखील परवडतील अशा दरांत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
जाणता राजा, सावरकर उत्सव, समर्थ उत्सव, मुंबई फेस्टीवल, हर्बल वर्ल्ड, वृक्षदिंडी, सहस्त्रकांच स्वागत, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, राष्ट्रीय सणांचे आयोजन, गुजरात भुकंपग्रस्तांसाठी मदत, साथीच्या निराकरणासाठी लसीकरणाची मोहीम, रक्‍तदान शिबिरे, करियर मार्गदर्शन शिबिरे, अतिवृष्टीमुळे पीडीत झालेल्यांना आवश्यक त्या जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा आदी अनेकाविध कार्यक्रमांतून प्रबोधनने माणुसकी जपली आहे. हीच प्रबोधनची समाजघटकांची असलेली बांधिलकी.
तर असा हा थोडक्यात १९७२ सालापासून सुरु झालेला ’प्रबोधन गोरेगाव’ नामक सतत प्रवाहाचा अथक प्रवास, जो यापुढेदेखील जनसेवेच्या अंगिकारलेल्या मार्गावर अविश्रांत वाटचाल करीत राहणार आहे.

 
  Prabodhan Goregaon is thankful to  
 

संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक मान्यवर व्यक्‍ती, संस्था, पत्रकार, क्रीडासमीक्षक त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासदांचे व अनेक कार्यकर्त्यांचे सतत सक्रीय व आर्थिक पाठबळ लाभले. त्याचप्रमाणे त्यांचा संस्थेवरील लोभ सतत वृद्धिंगतच होत गेला, त्यांच्या सहकार्यामुळेच आज संस्थेने यशस्वीरित्या विविध उपक्रमांमध्ये वाटचाल केली. सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या सेवक वर्गाचेही संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे सक्रीय योगदान आहे.
संस्थेस सतत आर्थिक पाठबळ देणारे देणगीदार, दानशूर व्यक्‍ती व संस्था त्याचप्रमाणे गोरेगावचे आमदार, नगरसेवक व महानगरपालिका प्रशासन या सर्वांची संस्था अत्यंत ऋणी आहे. त्या सर्वांबरोबरचे ऋणानुबंध व प्रेम सतत वृद्धिंगतच होत राहील, याचा आम्हास मनापासून विश्वास वाटतो.

 
 

- प्रबोधन गोरेगाव

 
 
 
© 2009 Prabodhan Goregaon. All Rights reserved. Best viewed in 1024 x 768 resolution Site designed & maintained by : Pristine Multimedia Pvt. Ltd.